15 मे 1957 रोजी, तमिळनाडूमधील एग्मोर येथे भगवान बुद्धांच्या 2581व्या जयंती निमित्त आयोजित पेरियार ई.व्ही. रामासामी यांनी एक प्रभावी भाषण केले.

तमिळनाडूमधील सामाजिक सुधारक, तत्त्वचिंतक आणि स्वाभिमानी चळवळीचे प्रणेते असलेले ई. व्ही. रामसामी ‘पेरियार’ यांनी आपल्या ज्वलंत विचारांनी भारतीय समाजव्यवस्थेतील जाती, धर्म, परंपरा, अंधश्रद्धा व ब्राह्मण्यवादावर कठोर टीका केली. त्यांच्या विचारधारेचा केंद्रबिंदू म्हणजे तर्कवाद, मानवतावाद, आणि समतावादी समाजरचना.
15 मे 1957 रोजी, चेन्नई (तमिळनाडू) येथील एग्मोरमधील महाबोधी संघमच्या परिसरात भगवान बुद्धांची 2581वी जयंती आणि 2501वे बौद्ध वर्ष यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पेरियार यांनी उपस्थित राहून एक प्रभावी आणि लक्षवेधी भाषण केले. या भाषणात त्यांनी बौद्धधर्माचे तत्त्वज्ञान, आर्य ब्राह्मणांनी केलेली धर्माची विकृती, बुद्धांच्या मूळ शिकवणीचा अपलाप, आणि भारतीय समाजात आजही असलेल्या अंधश्रद्धा व जातिव्यवस्थेच्या विळख्यावर मार्मिक आणि निर्भीड भाष्य केले.
पेरियार यांच्या या भाषणाचे अंश “Collected Works of Periyar E.V.R.” या ग्रंथातून घेतले गेले असून, याचे संकलन व संपादन डॉ. के. वीरमणी यांनी केले आहे. हे भाषण आजही समता, विवेक, आणि जातिनिर्मूलनासाठी लढणाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरते.
पेरियार यांचे बुद्धजयंती वरील भाषण खालीलप्रमाणे :
बुद्ध जयंती म्हणजे काय?
आपण बुद्धांचा जन्मदिवस का साजरा करतो? बुद्ध जयंती म्हणजे बुद्धांच्या फोटो किंवा मूर्तीची कापूर, नारळ आणि खाण्याच्या वस्तूंनी पूजा करणे नव्हे. त्याचा अर्थ असा की आपण बुद्धांच्या जीवनातून आणि त्यांच्या शिकवणींमधून काहीतरी शिकायचे ठरवले आहे आणि ते आपल्या आयुष्यात आचरणात आणायचे आहे.
मला नास्तिक समजले जाते. जर ‘नास्तिक’ म्हणजे वेद, शास्त्र आणि पुराणांचा इन्कार करणारा व्यक्ती असेल, तर मी निश्चितच नास्तिक आहे. अशा व्यक्तीस बुद्धांवर बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मी मानतो.
वेद, शास्त्र आणि पुराणांवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाने अशा प्रसंगी बोलणे म्हणजे फसवणुकीचा डाव आहे. तो माणूस लोकांना फसवण्यात पटाईत असावा आणि स्वतः ढोंगी असावा. अशा माणसांनी बुद्धांना एखाद्या ऋषी किंवा महात्मा प्रमाणे संबोधणे ही काही नवी गोष्ट नाही.
बुद्ध हे ना ऋषी होते ना महात्मा
बुद्ध हे ना ऋषी (संत) होते ना महात्मा. उलट त्यांनी प्राचीन हिंदू ऋषींच्या विचारांचा विरोध केला होता आणि म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिवस साजरा करतो. जसे बुद्ध ऋषी किंवा महात्मा नव्हते, तसेच बौद्ध धर्मही पारंपरिक अर्थाने धर्म नाही. अनेक लोक चुकीने बौद्ध धर्माला धर्म समजतात.
धर्म म्हणावा तर त्याच्या केंद्रस्थानी एक देव असतो. त्यात स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा, पाप-पुण्य अशी संकल्पनाही असतात. मोठा धर्म होण्यासाठी एक देव पुरेसा नसतो; तर अनेक देव, त्यांच्या बायका, उपपत्नी आणि सर्व प्रकारच्या मानवी संबंधांची कल्पना त्यात असावी लागते. भारतात लोक फक्त अशा प्रकारच्या धर्माशी परिचित आहेत.
तार्किक विचार हा सर्वश्रेष्ठ गुण
बुद्धांनी सुरुवातीलाच सांगितले की माणसाने देवाच्या कल्पनांमध्ये गुंतू नये. त्यांना माणूसच महत्त्वाचा होता. त्यांनी स्वर्ग किंवा नरकाविषयी काही सांगितले नाही. त्यांनी माणसाच्या चारित्र्यावर आणि योग्य आचरणावर भर दिला.
शहाणपण आणि तार्किक विचार हे माणसाचे सर्वात मोठे गुण आहेत, असे त्यांनी सांगितले. एखादी गोष्ट एखाद्या ऋषीने सांगितली किंवा महात्म्याने लिहिल्यामुळे ती खरी मानायची नसते. प्रत्येक बुद्धिमान माणसाने त्या गोष्टीचे विश्लेषण स्वतःच्या बुद्धीने करून सत्य शोधले पाहिजे.
म्हणूनच बौद्ध धर्म म्हणजे धर्म नाही, आणि म्हणूनच आपल्याला बुद्धांचा जन्मदिवस साजरा करण्यात आनंद वाटतो. बुद्धांचा तार्किक विचार फार मोठ्या प्रमाणात प्रतिगामी विरोधाला सामोरा गेला.
आजपासून 2500 वर्षांपूर्वी बुद्धांनी अशा काळात आपली शिकवण दिली जेव्हा भारतात अंधश्रद्धा आणि अमानुष धार्मिक प्रथा प्रचलित होत्या. त्यांनी त्या काळच्या धर्माचा स्पष्ट विरोध केला आणि त्यांना जो मोठा विरोध झाला तोच त्यांच्या थोरपणाचे आणि त्यांच्या विचारांच्या सामर्थ्याचे प्रमाण आहे.
त्यांच्या विचारांचे खंडन करण्यासाठी जे लोक पुढे लिहित गेले त्यांनीच हे सिद्ध केले की बुद्धांच्या तार्किक विचारांनी हिंदू धर्मव्यवस्थेला मोठे आव्हान दिले होते.
रामायणातील बुद्धांचा संदर्भ
रामायणामध्ये बौद्ध धर्माची निंदा केली गेली आहे. बुद्धांच्या शिकवणींचा प्रभाव कमी करण्यासाठी रामायणाचे पुनर्लेखन करण्यात आले आणि त्याचे विशाल रूप दिले गेले. बुद्धपूर्व काळातील रामायण केवळ एक छोटी कथा होती.
वैष्णव संप्रदायातील ‘नाळायिर प्रबंधम्’ आणि शैव संप्रदायातील ‘थेवरम्’ यांसारख्या ग्रंथांमध्येही बुद्धांचा उपहास केला गेला आहे. बौद्ध आणि जैन लोकांना नास्तिक, चोर, खुनी आणि वैदिक यज्ञांचे शत्रू म्हणून दाखवण्यात आले आहे.
शिवभक्तांनी तर शिवाजवळ अशी प्रार्थना केली आहे की, बौद्धांच्या बायकांचे शीलभंग (बलात्कार) करण्यासाठीचे सामर्थ्य मला दे.
‘नास्तिक’ या शब्दाचा अर्थ
‘बुद्ध’ हा शब्द केवळ एका व्यक्तीला संबोधत नाही. बुद्ध म्हणजे ‘बुद्धी’, म्हणजेच प्रज्ञा. ज्याच्यात बुद्धी आहे आणि तो तिचा योग्य वापर करतो, तोच खरा बुद्ध. प्रत्येक माणसाजवळ बुद्धी असते, पण तिचा वापर करणारेच बुद्ध होतात.
‘सिद्ध’ या शब्दाचाही अर्थ याच्याशी साधर्म्य असलेला आहे – इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा माणूस. विष्णू हा वैष्णव धर्माचा केंद्रबिंदू आहे, पण बौद्ध धर्मात बुद्धी हे केंद्र आहे. आज ‘नास्तिक’ म्हणजे देव नाकारणारा असे मानले जाते.
पण मुळात जो कोणी देवाच्या अस्तित्वाचा निषेध करतो आणि बुद्धीचा वापर करून गोष्टींवर तार्किकपणे विचार करतो, त्याला ‘नास्तिक’ मानलं जातं. ब्राह्मणवादाचा निषेध करणाऱ्यांना देखील ‘नास्तिक’ म्हणतात.
नास्तिक हा शब्द बदनाम केला
काही काळापूर्वी इरोड येथे एक बौद्ध परिषद झाली. त्या परिषदेमध्ये वर्ल्ड बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष श्री. मल्लाल शेखर यांनी आपल्या भाषणात सुंदरपणे सांगितले की आपण येथे जमलेलो प्रत्येकजण म्हणजे अनेक बुद्धच आहोत. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका मध्ये बौद्ध धर्माला असा उल्लेख आहे की तो बुद्धीचा वापर करण्याची शिकवण देतो आणि अंधश्रद्धेचा निषेध करतो.
आजच्या काळात बुद्धीला फारसा मान मिळत नाही. शाळा आणि महाविद्यालये लोकांना बुद्धीचा वापर करायला, परंपरा, प्रतिक्रियावाद आणि अंधश्रद्धेला प्रश्न विचारायला शिकवत नाहीत. जे काही जण बुद्धीचा वापर करतात, त्यांना लगेच नास्तिक ठरवले जाते – ‘नास्तिक’ या शब्दाला आता अर्थच राहिलेला नाही. तार्किक विचार करणाऱ्या व्यक्तीला अनेक वेळा नास्तिक असल्याचे खोटे खंडन करावे लागते, कारण हा शब्द खूप वाईट अर्थाने वापरला जातो.
बुद्धांनी देखील लोकांना त्यांची शिकवण डोळेझाकपणे मान्य करायला सांगितली नव्हती. त्यांनी सांगितले की माझ्या शब्दांचे परीक्षण करा, बुद्धीने त्याचे विश्लेषण करा आणि जे योग्य वाटेल तेच स्वीकारा.
उघड्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहिले
गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी त्यांच्या काळातील लोकांच्या अज्ञान आणि अशिक्षिततेला अनुसरून आपले तत्त्वज्ञान उपदेशिले. त्या वेळच्या लोकांची बुद्धी आणि समज मर्यादित होती. तेव्हा सांगितलेली प्रत्येक गोष्ट आजही तशीच खरी किंवा पूर्णपणे लागू पडते, असे म्हणता येणार नाही.
आज बुद्धांच्या प्रत्येक शब्दाला शाब्दिक अर्थाने खरे मानणे, माझ्या मते, हीही एक प्रकारची ‘आस्थिकता’ आहे. त्या काळात लोक आकाशाकडे उघड्या डोळ्यांनी पाहत आणि त्यांना फक्त थोडक्याच गोष्टी माहीत असत.
आज आपण शक्तिशाली दुर्बिणीतून पाहतो आणि सूर्यावरील काळे डागसुद्धा तपासू शकतो. आपले पूर्वज जेवढे जाणत होते त्यावरच विश्वास ठेवणे, म्हणजे मानवी सर्जनशील बुद्धी आणि उद्दिष्टपूर्ण प्रगती यांना मर्यादा घालणे होय.
आर्यमतामुळे देश बर्बर झाला
बौद्धधर्माच्या दृष्टीने हे खरं ठरेल की ज्ञान काळानुसार वाढत जातं आणि आपण आपल्या कल्पना या प्रगतीनुसार बदलल्या पाहिजेत. जुन्या कल्पनांनाच अंतिम सत्य मानणे, ही बौद्धिक मागासलेपणाची खूण आहे आणि विचारशीलतेच्या प्रगतीला अडथळा आणणं आहे.
बुद्ध त्या काळात उदयास आले, जेव्हा आर्यमतामुळे देश मूळचा बर्बर आणि अतार्किक झाला होता. शास्त्र आणि पुराणं लिहिणारे लोक त्यांच्या पद्धतीने हुशार होते, पण त्यांच्या हेतूमध्ये साम्राज्यवादी आणि वसाहतवादी वृत्ती होती. सामान्य लोकांचे भले हे त्यांच्या विचारातच नव्हते. शास्त्र आणि पुराणं यावरून हे निर्विवादपणे सिद्ध होतं.
थिरुवेल्लुवर आणि त्यांच्या मर्यादा
थिरुवेल्लुवर [प्राचीन तमिळ संत-कवी] यांच्याविषयी माझ्या हृदयात खोल आदर आहे, पण त्यांच्याही काही मर्यादा होत्या. अगदी प्राचीन काळात लिहिलेला सर्वोच्च ग्रंथसुद्धा, त्याकाळी उपलब्ध असलेली बुद्धिमत्ता किंवा त्या वेळेपर्यंतच्या मानवी बौद्धिक प्रगतीच्या पलीकडे जाऊ शकला नाही. [पेरियार इथे ‘थिरुक्कुरल’ या ग्रंथाचा उल्लेख करत आहेत. ‘थिरुक्कुरल’ हा तमिळ भाषेतील एक अतिप्राचीन ग्रंथ आहे, जो थिरुवेल्लुवर यांनी लिहिला. पेरियार यांनी अनेक ठिकाणी या ग्रंथाची स्तुती केली आहे, पण त्याचबरोबर त्यात असलेल्या कमकुवत गोष्टी किंवा ज्या गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत, त्यांबाबत त्यांनी बोटही ठेवले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की मूळ ‘थिरुक्कुरल’ अशा त्रुटींना मुक्त होता. पण ब्राह्मणांचे दक्षिणेकडे आगमन झाल्यानंतर त्यांनी आपले हितसंबंध सांभाळण्यासाठी तेथील प्राचीन ग्रंथ बिघडवले.] म्हणून ऋषी-मुनी, बुद्ध किंवा थिरुवेल्लुवर यांनी जे काही सांगितले आहे, तेच अंतिम सत्य आहे किंवा तेच मानवी बुद्धिमत्तेची मर्यादा आहे, असे मानणे पूर्णपणे अयोग्य आहे.
तरीसुद्धा, गौतम बुद्ध आणि थिरुवेल्लुवर यांना आपण यासाठी आदर देतो, की ज्या काळात हिंदू धर्म आणि समाज पूर्णपणे असभ्य होता, लोक बर्बर होते, समाजाचा बहुतांश भाग अगदी थोड्याच लोकांच्या सुख, संपत्ती आणि ऐषआरामासाठी गुलामासारखा राबत होता—त्या काळात बुद्धीवाद (rationalism) प्रस्थापित करणे, तर्क आणि ज्ञानाच्या महत्त्वाची ओळख करून देणे, ही गोष्ट फक्त त्यांच्यासारख्या धाडसी लोकांनाच शक्य होती. त्यांनी हे आपल्या धैर्यावर आणि बुद्धीवर विश्वास ठेवून करून दाखवलं.
धार्मिक प्रवृत्तीचे लोक पुराणांमध्ये सांगितलेल्या खोट्या, बिनबुडाच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यांच्या स्तुतीत गीतं गात राहतात. पण जेव्हा त्यांना खरी इतिहास माहिती करून दिली जाते, तेव्हा ते फक्त एवढंच म्हणतात, “गोर्या इंग्रजांनी भारताबद्दल जे काही लिहिलं आहे, त्यावर विश्वास ठेवू नका.” हे असे लोक असतात, जे स्वतःच्या विवेकविरुद्ध आणि अंतःकरणाच्या विरुद्ध खोटी वक्तव्यं करत असतात.
त्यांचं वातावरण नेहमी अशा लोकांनी वेढलेलं असतं, जे आपली स्वतंत्र विचारशक्ती गमावून बसलेले असतात. धर्म आणि देव यांचं नाव घेत, धार्मिक लोकांनी मनात येईल ते बडबड करणं आणि बढाया मारणं हेच शिकलं आहे—भलेही त्यांच्या बोलण्याचा काही इतिहासाशी किंवा त्या काळातील समाजाच्या वास्तवाशी काहीही संबंध नसला, तरी त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं नाही. हे स्पष्ट आहे की धर्म स्वतःला अंधश्रद्धेपुरताच मर्यादित करून बसला आहे.
पुराणांची रचना गौतम बुद्धांच्या नंतरची
ज्या काळात हे सांगितले जात होते की ब्रिटिश इतिहासकारांनी भारताबद्दल जे लिहिले आहे, त्यावर विश्वास ठेवू नये, त्या काळात उत्तर भारतात असलेल्या भारतीय विद्या भवन नावाच्या संस्थेच्या अधिपत्याखाली मूर्खपणाच्या धार्मिक आख्यानांवर आणि अलोकशाही ग्रंथांवर केंद्रित पुस्तके सातत्याने छापली जात होती.
श्री. मुंशी (कन्हैयालाल माणिकलाल मुंशी) हे त्या संस्थेचे अध्यक्ष होते; आणि अब्जाधीश बिरला (घनश्यामदास बिरला) व डॉक्टर राधाकृष्णन (सर्वपल्ली) हे तिचे विशेष सदस्य होते. त्यांनी वैदिक युग नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते [ही एक प्राचीन इतिहास व संस्कृतीवर प्रकाशित झालेली पुस्तकमाला होती. प्राच्यविद रमेशचंद्र मजुमदार हे तिचे संपादक होते].
त्या पुस्तकाच्या निर्मितीत श्री. मुंशी यांचा मोठा सहभाग होता. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतही लिहिले होते की, “प्राचीन काळ बर्बर होता. पुराणे आणि महाकाव्ये इतिहास नाहीत. त्यामध्ये समकालीन घटनांचे वर्णन नाही. ‘व्यास’ या शब्दाचा अर्थ आहे — गोष्टी सांगणारा (कथाकार).” तेच पुराण लोकांच्या मनात आणि मेंदूत बसवले गेले. लोकांच्या नैसर्गिक बुद्धीवर ताबा मिळवून, त्यांनी त्यांचे मार्गदर्शन करायला सुरुवात केली. हेच आपल्या समस्यांचं सर्वात मोठं कारण आहे.
तीन-चतुर्थांशांहून अधिक पुराणांचा लेखनकाल बुद्धांच्या नंतरचा असल्याचं सांगितलं जातं. बुद्धांनी दिलेल्या तर्कवादी शिक्षणाच्या विरोधात, लोकांचे लक्ष त्याच्यापासून दूर नेण्यासाठी आणि त्यांना ब्राह्मणवादाकडे वळवण्यासाठी पौराणिक ऋषींनी अवतारांच्या खोट्या गोष्टी निर्माण केल्या.
कृष्णाला त्यांचा प्रमुख बनवण्यात आलं. हिंदू देवी-देवतांच्या चमत्कारिक कृती नेहमीच लोकांना विशेष आकर्षण आणि उत्तेजना देणाऱ्या ठरल्या आहेत. कृष्णावरचं महाकाव्य तर संपूर्णपणे लैंगिकतेने आणि अश्लीलतेने भरलेलं आहे. एवढं सगळं असूनसुद्धा, त्याला दैवी स्वरूपात घोषित करण्यात आलं. भगवद्गीता ही महाभारतात खूप नंतरच्या काळात जोडली गेली होती.
अशा अश्लील आणि कामुक वातावरणात कृष्णासारखा देवता घडविणे आणि त्याच्या स्तुतीमध्ये भजन गाणे, नाटके व नृत्यांचे आयोजन करण्याचे भले काय औचित्य आहे!
कृष्णलीला तर सिनेमाच्या पडद्यावरही दाखवण्यात आली आहे. जे भक्त कृष्णलीला स्थळी हात जोडलेले, टाळ्या वाजवत, तन्मयतेने गात-नाचत असतात, तेच भक्त त्या देवाला स्वतःच्या घरात, स्वतःच्या पत्नीजवळ जाण्याची परवानगी देण्याचे धैर्य दाखवू शकणार नाहीत.
लोकांचे अंतःकरण ज्या कृतीपासून त्यांना रोखते, त्या कृतीचा सार्वजनिक व्यवहारात विरोध का केला जात नाही? अश्लीलता, संकुचितता आणि व्यभिचाराने भरलेल्या त्या देवाच्या उत्सवांना समाजात स्थान का मिळावे?
जातीतून माझा अभिप्राय वेगळा आहे
आज कोणताही व्यक्ती जातिप्रथेचे समर्थन करण्याचे धैर्य दाखवत नाही. कदाचित सी. राजगोपालाचारी यास अपवाद असतील. ते जातिवाद टिकवून ठेवू इच्छितात. जर त्यांना समोरासमोर जाऊन विचारले गेले असते, तर त्यांनी कदाचित असेच उत्तर दिले असते – “जातीतून माझा अभिप्राय वेगळा आहे.”
वेद, धर्मशास्त्रे आणि पुराणांचा आधार नसता, तर जाति टिकली असती काय? वेद, धर्मशास्त्रे आणि पुराणांचा त्याग केल्यावाचून जातिप्रथेचे उच्चाटन शक्य आहे काय? धर्मशास्त्रांचा एकमेव हेतू हा आहे – ब्राह्मणेतर, जसे की शूद्र आणि पारिया अछूत यांचा कायम अपमान करणे आणि पुरोहित वर्गाचे संरक्षण करणे.

खांद्यावर देवता आणि बुद्धाची स्तुती
बुद्ध जयंती किंवा बुद्ध दिन साजरा करणे आपल्यासाठी का गरजेचे आहे? जर बुद्धांना अलवार व नयनमार संतांच्या पंक्तीत बसवायचे असेल, तर त्यांना विसरलेलेच बरे. बुद्ध जयंती हे प्रत्यक्षात वैदिक धर्म मानणाऱ्यांसाठी शत्रु-दिन आहे.
ब्राह्मण वर्चस्व असलेली माध्यमे (मीडिया) अशा कार्यक्रमांची खरी बातमी देणार नाही. त्याऐवजी त्यांची वर्तमानपत्रे एक किंवा अधिक पौराणिक सभांच्या जाहिरातींनी भरलेले असतील.
नंतर त्या सभांशी संबंधित बातम्यांनी त्यांच्या पानांना भरून टाकले जाईल. अशा वातावरणात जात नष्ट करणे, आणि बुद्धिवादाचा वर्चस्व पुनःस्थापित करणे किती कठीण आहे, हे सांगणे शक्य नाही. त्याची कल्पना करून समाधान मानणेच योग्य ठरेल.
दुनियेत कोणत्या देशात एवढे देव आहेत, जेवढे आपल्या देशात आहेत? इतक्या बऱ्याच चारित्र्यहीन देवांची उपस्थितीचे औचित्य तरी काय? अशा देवांवर विश्वास ठेवून, त्यांना खांद्यावर वाहून, बुद्धाची स्तुती करून काही लाभ होणार नाही.
हे देव बहिष्कृत केल्यावरच लोक स्वतः बुद्ध होतील. मनुष्याच्या रूपात, जो दुःख-सुख देतो, जो मानवी अपराध आणि सद्गुणांत सामील असतो – असा देव असूच शकत नाही. विष्णु, शिव आणि ब्रह्मा या हिंदू त्रिदेवांच्या कथा अश्लीलता, हिंसा, मूर्खपणा आणि हत्या यांनी भरलेल्या आहेत.
घाणेरड्या पुजाऱ्याचे पाय धुणे
आश्चर्य म्हणजे, पुराणांवर विश्वास ठेवणारे लोक देखील येथे येतात आणि बुद्ध जयंती साजरी करण्यात भाग घेतात. हेच लोक मंदिर बांधणाऱ्याला दयाळू व परोपकारी मानतात. त्यांना वाटते की भक्ति ही फक्त दगडी स्तंभावर कपाळ आपटूनच व्यक्त होते.
हेच लोक घाणेरड्या पुजाऱ्यांचे पाय धुणे हेही भक्ती समजतात. गौतम बुद्धांसारख्या जगातील महान बुद्धिवादी विचारवंताच्या प्रभावाला निष्प्रभावी करण्यासाठी या पौराणिक लोकांनी त्यांच्या विषयीचा सत्य इतिहास तोडून-मोडून व विकृत करून सादर केला आहे.
जात नष्ट करण्याचे धैर्य नाही
रामायण आणि महाभारतासारख्या ग्रंथांवर आधारित पुस्तके आजही हजारोंच्या संख्येने लिहिल्या जातात आणि विकल्या जातात. यांचा उद्देश काय आहे? हा उद्देश स्पष्ट आहे – जातिवाद, अंधश्रद्धा आणि गुलामगिरीची मानसिकता टिकवून ठेवणे.
जर भारतात स्वतंत्रता, समता आणि बंधुत्व या जीवनमूल्यांवर आधारित लोकशाही निर्माण करायची असेल, तर जातिवादाला मूळापासून उखडून टाकावे लागेल. अशी सरकार असली पाहिजे, जिला हे करण्याचे धैर्य आहे. जी जातिवादासारख्या विकृतीपासून समाजाची सुटका करू शकते. आज आपल्याकडे अशी सरकार आहे जी जातिवादाच्या दोषांवर बोलते, पण त्याला नष्ट करण्याचे धैर्य तिच्यात नाही.
डॉ. राधाकृष्णन यांनी असे म्हणण्याचे धैर्य दाखवले की, “आपण राजे व जमीनदार यांना उखडून टाकण्याचे धैर्य दाखवले आहे. स्थायी आणि दूरगामी लाभांसाठी आपण जातिवाद नष्ट केला पाहिजे. हे करण्यासाठी आपल्याकडे लोखंडी हृदय असलेले लोक पाहिजेत.”
सरकारकडे अशी कल्पना आहे, पण जातिवादावर आघात करण्याची इच्छा नाही. आपला हेतू देवविरहित समाज निर्माण करणे नाही. आपण असा समाज निर्माण करू इच्छितो, ज्यामध्ये सत्य आणि विवेक हेच देवता असतील.
बुद्ध : क्रांतिकारी परिवर्तनासाठी अनिवार्य
23 जानेवारी 1954 रोजी आम्ही इरोड येथे एका बौद्ध संमेलनाचे आयोजन केले होते. त्या आयोजनामागे आमचा उद्देश काय होता? आमचा हेतू स्वतःला बौद्ध धर्माचे अनुयायी घोषित करणे होता का? त्या माध्यमातून आम्ही हिंदू धर्म संपवून बौद्ध धर्म आणू इच्छित होतो का? नाही.
मग बुद्धाच्या नावावर संमेलन घेण्याचे कारण काय होते? ते कारण असे होते की आम्हाला वाटते की आम्ही जे बदल घडवू इच्छितो, हिंदू धर्मातील ज्या वाईट गोष्टींचा नाश करू इच्छितो, गौतम बुद्धांच्या शिकवणी त्याचा पूर्ण पाठिंबा करतात.
गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सिद्धांत आणि उपदेश आमच्या स्वाभिमान व बुद्धिवादी चळवळीच्या पाठिशी उभे आहेत. ईश्वर, जात, गोत्र, धर्मशास्त्रे, पुराणे आणि महाकाव्ये ही आमच्या गुलामीची कारणे आहेत.
या गोष्टींपासून आम्ही मुक्त व्हायचे आहे. जीवनमूल्यांनी समृद्ध असलेले गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि शिकवणी आमच्या क्रांतिकारी ध्येयांसाठी अत्यंत मौल्यवान आहेत.
आमच्या आदर्शांचे प्रतीक
आपण आज प्रचार करत असलेल्या अनेक गोष्टी आधीच गौतम बुद्धांच्या अडीच हजार वर्षे जुन्या शिकवणीत होत्या. बौद्ध धर्म आमच्या आदर्शांसाठी एक मूळ स्रोत, एक मानक संस्था आहे.
जेव्हा रामासामी (पेरियार) यांनी स्वाभिमान चळवळीचे आदर्श प्रसारित करायला सुरुवात केली, तेव्हा काही लोकांना वाटले की त्यात काही मोठे, अद्वितीय किंवा महत्त्वाचे नाही. त्यांना वाटले की मी गीतेपेक्षा मोठा होऊ शकत नाही.
अशा लोकांसाठी, कमीत कमी बौद्ध धर्म हा मोठा प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरतो. आमचे आदर्श बाजूला सारणे किंवा पुसून टाकणे परंपरावाद्यांसाठी सोपे होणार नाही. त्यांना हे दाखवणे आवश्यक आहे की बुद्धिवाद तितकाच जुना आहे जितका बौद्ध धर्म आहे; आणि आम्ही आज जे प्रचार करत आहोत, त्यात काहीही नवीन नाही.
बुद्ध हिंदूंसाठीही स्वीकृत आणि पूजनीय
ऐतिहासिक गरजांमुळे हिंदूंनी बुद्धांचे धर्म-तत्त्वज्ञान स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर त्यांची पूजा सुद्धा केली गेली. तरीही इतिहास आपल्याला दाखवतो की बौद्ध धर्मीयांना छळले गेले. त्यांची हत्या करण्यात आली.
त्यांचे मठ-विहारे जाळले गेले. त्यांच्या धर्मतत्त्वज्ञानाला हिंदू कट्टरपंथ्यांनी फार पूर्वीच नष्ट केले. काही बौद्ध अनुयायांना खोल समुद्राच्या तळाशी बुडवले गेले. एवढ्या कटकारस्थानांनंतरही, हिंदू मनातून गौतम बुद्धांची आठवण पुसता आली नाही.
ब्राह्मणांनी त्यांना विष्णूचा अवतार घोषित केले
शेवटी ब्राह्मणांना गौतम बुद्धांना विष्णूचा दहावा अवतार मान्य करावा लागला. अशा प्रकारे सर्व काही गिळून टाकणाऱ्या हिंदू धर्माने शैव व वैष्णव पंथांप्रमाणे बौद्ध धर्मालाही आपली उपशाखा मानले.
कदाचित प्राचीन काळी त्यांनी चांगली वागणूक दिली असेल, कदाचित नाही, पण सत्य हे आहे की भारतात बौद्ध धर्म कधीच पूर्णपणे नष्ट झाला नाही. इतकेच नाही तर स्वतंत्र भारताच्या सरकारलाही मान्य करावे लागले की बुद्धांना विसरणे शक्य नाही. म्हणून शैव व वैष्णव पंथांपासून वेगळे ठेवून, बौद्ध धर्माच्या शिक्षणाला अधिकृत मान्यता देण्यात आली.
राष्ट्रीय ध्वजात धम्मचक्र
बौद्ध धर्माचा प्रतीक असलेल्या धम्मचक्राला आपल्या राष्ट्रीय ध्वजात सन्माननीय स्थान मिळाले. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चार सिंहांच्या मूर्तीला राष्ट्रीय प्रतीक म्हणून मान्यता मिळाली.
तीच मूर्ती आपल्या सैन्य अधिकाऱ्यांच्या खांद्यांवर, मंत्र्यांच्या गाड्यांवर, सरकारी वाहनांवर आणि पोस्टकार्डांवर झळकते. स्वातंत्र्यानंतर गौतम बुद्ध जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली.
आपली चळवळ दुर्बल होऊ शकते का?
या सर्व गोष्टींचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की स्वातंत्र्योत्तर भारत सरकारने गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिकवणीला मान्यता दिली आहे. त्यांना राष्ट्रीय महत्त्वाचे मानले आहे.
कोणतेही हिंदू चिन्ह – शैव किंवा वैष्णव प्रतीकाला राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारणे सरकारला शक्य नव्हते. याचा अर्थ असा की भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हिंदू प्रतीक पूर्णपणे अयोग्य आहेत. आपल्या जनतेच्या इतिहासात मी याला एक क्रांतिकारी टप्पा मानतो.
ब्राह्मणवाद्यांच्या अनुसार कुरळचे विकृतीकरण
ब्राह्मणांनी ही एक कुटील योजना आखली की तार्किक – बुद्धिवादी विचारवंतांना आपले मानून त्यांचे विचार विकृत करून सादर करावेत, जेणेकरून ते अलोकशाही, वर्चस्ववादी ब्राह्मण शिकवणुकीशी सुसंगत ठरावेत.
आधी त्यांनी हे बुद्धांबरोबर केले, मग थिरुवल्लुवरबरोबर. स्वाभिमान चळवळीने कुरळ ग्रंथाला आपले नीती-ग्रंथ मान्य केल्यापूर्वी, ब्राह्मण आणि त्यांच्या शूद्र अनुयायांनी कुरळची स्तुती केली. त्यांचा खरा हेतू कुरळच्या शिक्षणाचे विकृतीकरण करून त्याला ब्राह्मणवादाच्या अनुकूल बनवणे होता.
ब्राह्मण टीकाकार परीमेलअझागर यांनी त्यांच्या भाष्यांत आर्य धर्माच्या तत्वांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेतले, आणि त्यामुळे तिरुवल्लुवर यांच्या खऱ्या विचारांना लपवण्यात यश मिळवले.
स्वाभिमान चळवळीने कुरलचे खरे अर्थ उलगडले, तेव्हापासून कुरल पुन्हा आपल्या प्राचीन तेज आणि वैभवाने झळकू लागला. आज देशभरात ‘कुरल’ अभ्यासक आणि संस्था निर्माण झाल्या आहेत.
आता शाळांमध्ये कुरलचा अधिक अभ्यास होतो आहे, आणि आर्य विचारांनी भरलेल्या जातिवादी, अंधश्रद्धा असलेल्या रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांचे अध्ययन कमी कमी केले जात आहे.
बुद्धांनी मूर्तिपूजेचा निषेध केला
गौतम बुद्धांनी तर्क आणि बुद्धीला प्रथम स्थान दिले. त्यांनी प्राचीन ऋषींच्या वचनांना डोळे झाकून मान्य करणे नाकारले. ते लोकांना स्वतःच्या विवेकाने सत्याचा अनुभव घ्यायला शिकवत होते.
त्यांनी ईश्वरावर, आत्म्यावर किंवा परमात्म्यावर विश्वास ठेवायला नकार दिला. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंधाला त्यांनी अमान्य केले. यामुळे त्यांना पुष्कळ विरोधाचा सामना करावा लागला.
आम्ही आज हेच कार्य बुद्धधर्मासाठी करत आहोत. या धर्माचे सत्य खुलेपणाने सांगितले जात आहे आणि त्यामुळे पारंपरिक, कर्मकांडप्रिय हिंदूंना अस्वस्थ वाटू लागले आहे. त्यांचा असूया आणि राग आम्हाला अजिबात त्रास देत नाही.
संतांच्या शिकवणीत बुद्धिमत्ता नव्हती
बुद्धांनी विवेकवादाला प्रथम स्थान दिले. प्राचीन संत किंवा स्वयंघोषित दैवी विद्वानांच्या लेखनात त्यांनी कोणतीही बुद्धिमत्ता मानली नाही. त्यांनी लोकांना स्वतःच सत्याचा शोध घ्यावा असे सांगितले.
त्यांनी देव अस्तित्वाविषयी कोणतीही ठाम मते व्यक्त केली नाहीत, पण आत्मा या संकल्पनेचा त्यांनी निषेध केला — कारण आत्मा हा परमतत्त्वाचा अंश मानला जात होता, आणि त्यामुळे देवाच्या दुसऱ्या मार्गाने ओढून आणला जात होता.
एका परिपूर्ण, सर्वज्ञानी देवाचा अंश असलेल्या आत्म्याने पाप-पुण्य जमा करावे, हे अत्यंत विरोधाभासी ठरते. बुद्धांनी आत्मा आणि परमात्मा यांच्यातील हे संबंध जोरदारपणे नाकारले.
बुद्धांनी मूर्तिपूजा, वैयक्तिक देवांची पूजा, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचा स्पष्ट निषेध केला. आर्यांनी जे काही पवित्र आणि दैवी मानले होते, त्या सगळ्यावर बुद्धधर्माने घणाघाती प्रहार केले.
विध्वंसक शस्त्रधारी देवता
पुरातत्त्ववेत्ते सिद्ध करतात की बहुतेक हिंदू मंदिरे पूर्वी बौद्ध विहारे होते. अगदी श्रीरंगम, कांचीपूरम, पालनी, तिरुपती ही सगळी ठिकाणं पूर्वी बौद्धांची तीर्थक्षेत्रं होती. जिथे कधी दयाळू, सौम्य, करुणामय बुद्धांची मूर्ती होती, तिथे आता हत्यारं घेतलेले युद्धप्रिय देव ठेवले गेले आहेत.
कोणताही हिंदू देवता असा नाही ज्याच्याकडे विध्वंसक शस्त्र नाही — जणू काही त्याच्या खात्यावर हत्याकांड जमा झाल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. शैव आणि वैष्णव पंथांचे देव प्रेममय असल्याचा त्यांनी कितीही प्रचार केला, तरी त्यांच्या हिंस्र स्वरूपावरून ते खोटं सिद्ध होतं. प्रेम आणि हिंसा यांचं काय नातं?
सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे, या सर्व युद्धप्रिय देवांची पूजा करूनही, हिंदू हे जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत सर्वात अधिक भित्रे लोक ठरतात.
हिंदीमध्ये वाचा : बुद्ध जयंती के मौके पर पेरियार का ऐतिहासिक संबोधन
हे ही वाचलंत का?
- पेरियार यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील भाषण
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सोपारा येथे बुद्धजयंती निमित्त भाषण (6 मे 1955)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दीक्षाभूमीवरील ऐतिहासिक भाषण (15 ऑक्टोबर 1956)
- देहू रोड येथे बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण (25 डिसेंबर 1954)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारनाथ येथील भाषण (24 नोव्हेंबर 1954)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक विविध लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.