भारतात लोकशाही रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या शिल्पकाराचे सामाजिक लोकशाही विषयक विचार (Thoughts of Dr Babasaheb Ambedkar on Social democracy) महत्त्वपूर्ण आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही विषयक विचार (Thoughts of Dr Babasaheb Ambedkar on democracy) आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही विषयक विचार (Thoughts of Dr Babasaheb Ambedkar on democracy) आपण जाणून घेणार आहोत. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतात लोकशाही रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या शिल्पकाराचे सामाजिक लोकशाही विषयक विचार (Thoughts of Dr Babasaheb Ambedkar on Social democracy) महत्त्वपूर्ण आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व आर्थिक लोकशाही संदर्भातील विचार प्रकट केले आहेत. तसेच बाबासाहेबांनी सामाजिक लोकशाही व राजकीय लोकशाही यांच्यातील आंतर संबंधांवर देखील आपले विचार मांडले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक लोकशाहीविषयक विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा विचार सभोवतालच्या सामाजिक, आर्थिक वास्तवाच्या संदर्भात केला असल्यामुळे त्यात आदर्शापेक्षा व्यावहारिक प्रश्नांचे विवेचन करण्यात आले आहे. सामान्यातील सामान्य माणसाच्या प्रतिष्ठेची प्रतिष्ठापना करणारा विचार म्हणून डॉ. आंबेडकरांना लोकशाहीबद्दल आस्था वाटत होती.
प्रत्येक देशात प्रस्थापितांची एकाधिकारशाही नष्ट होऊन वर्षांनुवर्षे सत्तावंचित राहिलेल्या पददलित वर्गांना सत्ताप्राप्त होणे ही डॉ. आंबेडकरांच्या मते लोकशाहीची कसोटी असते. सार्वत्रिक प्रौढ सत्ताधिकारांच्या माध्यमातून ही यशस्वीतता मोजली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, राजकीय लोकशाही ही चार गृहीतांवर आधारलेली असते.
१) व्यक्ती हेच एकमेव साध्य आहे.
२) व्यक्तीला काही आदेश हक्क असतात व राज्यघटनेने त्या हक्कांची हमी त्याला दिलीच पाहिजे.
३) कोणत्याही विशेषाधिकाराच्या प्राप्तीखातर व्यक्तीला आपल्या हक्कांचा त्याग करावा लागू नये.
४) इतरांवर शासन करण्याची सत्ता राज्यसंस्थेकडून कोणत्याही खासगी व्यक्तींना दिली जाता कामा नये.
कोणत्याही स्वरूपाच्या हुकुमशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. कारण तेथे व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते. हक्कांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना होतो हा डॉ. आंबेडकरांच्या मते लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ निकष आहे.
सुरुवातीला अध्यक्षीय लोकशाहीचा पुरस्कार
संविधान सभेमध्ये आणि त्यापूर्वी 1942 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीची भलावण केली असली तरी ‘स्टेटस् अँड मायनॉरिटीज’ या ग्रंथात त्यांनी संसदीय लोकशाहीपेक्षा अन्य प्रकारच्या लोकशाहीचा पुरस्कार केला.
इंग्लंडमध्ये अल्पमत बहुमत राजकीय आधारावर असते तसे होण्याची भारतात शक्यता नाही. कारण इथले बहुमत जातीवर आधारित असेल याविषयी डॉ. आंबेडकरांना खात्री होती. त्यामुळे अल्पसंख्य गटांना कायम जाच होण्याचीच शक्यता अधिक दिसत होती.
अमेरिकेसारखी अध्यक्षीय शासनपद्धती स्वीकारल्यानंतर कार्यकारी मंडळाला आपल्या कार्यकाळाची हमी मिळू शकेल आणि विधिमंडळाबाहेरील योग्य व्यक्तीला कार्यपालिकेत समाविष्ट देखील करता येईल. या दृष्टीने अध्यक्षीय शासनपद्धती डॉ. आंबेडकरांना योग्य वाटत होती.
संसदीय लोकशाही शासनपद्धतीचा पुरस्कार
पुढे मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या भूमिकेला मुरड घालून संसदीय शासनपद्धतीची उपयुक्तता अधोरेखित केली. संसदीय लोकशाही व्यक्तीच्या अंगी आत्मनिर्भरता उपक्रमशीलता व जबाबदारीची जाणीव निर्माण करू शकते.
रक्तपात न घडवता सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त संसदीय पद्धतीलाच अवगत असतो. दुसरे म्हणजे वादग्रस्त प्रश्नांवरती मोकळ्या चर्चेअंती व सर्वसंमतीने निर्णय घेण्याची तरतूद फक्त संसदीय पद्धतीतच असते.
प्रबल विरोधी पक्ष, स्वतंत्र वृत्तपत्रे आणि मुक्त न्याय निवडणुका ही संसदीय लोकशाहीची वैशिष्टये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना फार महत्त्वाची वाटतात.
सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार
भारताच्या संदर्भात संसदीय लोकशाहीशिवाय दुसरा पर्यायच नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. संसदीय पद्धतीत राजकीय क्षेत्रापासून सुरू झालेली लोकशाहीकरणाची प्रक्रिया हळूहळू सामाजिक व आर्थिक क्षेत्राकडे संक्रमित होते. याकडे डॉ. आंबेडकर लक्ष वेधतात.
स्वातंत्र्यावरच लक्ष केंद्रित करून आर्थिक विषमतेकडे दुर्लक्ष झाल्यास संसदीय लोकशाही हे आर्थिक अन्यायाचे साधन ठरू शकते. आर्थिक व सामाजिक लोकशाहीची उपेक्षा करून राजकीय लोकशाहीचा डोलारा फार काळ टिकू शकत नाही. असा इशारा बाबासाहेब देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार केला आहे. त्यांच्या मते, लोकशाही ही सामाजिक संघटना आहे. समाजात योग्य ती सुधारणा व प्रबोधन न झाल्यास त्यात राजकीय लोकशाहीची प्रगती होण्याची सुतराम शक्यता नसते.
व्यक्तीचा छळ वा तिच्यावर जुलूम करण्याची जेवढी प्रभावी व व्यापक साधने समाजाला उपलब्ध असतात तेवढी राज्यसत्तेवर असतात, असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. त्यामुळेच त्यांनी सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.
लोकशाहीतील अडथळे
लोकशाही शासन लोकशाही समाजापासून अशक्य असते. त्यामुळे योग्य मानसिक दृष्टिकोन निर्माण होणे व योग्य अशी समाजरचना असणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आवश्यक वाटते. भारतातील दारिद्र्य, जातीय वेगळेपण व निरक्षरता हे लोकशाहीच्या मार्गातील अडथळे आहेत असे डॉ. आंबेडकरांना वाटते.
त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांना असे आवाहन केले की, इथल्या समाज व्यवस्थेचे जाच आणि व्यंगे आहेत. त्यांचे प्रतिबिंब नव्या राजकीय व्यवस्थेत पडणार नाही याची दक्षता घ्यावी. पददलितांना शिक्षण, प्रबोधन व प्रगती यांच्या वाटा जर खुल्या होणार नसतील तर स्वराज्य हे गुलामगिरीचेच नवे नाव ठरेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
केवळ ‘एक व्यक्ती एक मत’ हे तत्त्व सामाजिक लोकशाहीसाठी पुरेसे नसते तर अमलात आणले जाणे आवश्यक असते. डॉ. आंबेडकरांच्या मते, उपाशी पोटी राहणाऱ्या व्यक्तीला मताचे मोल फुटक्या कवडीपेक्षा जास्त वाटण्याची शक्यता नाही म्हणून आधी परिस्थिती बदलली पाहिजे.
सर्वांच्या किमान प्राथमिक गरजा भागल्याच पाहिजे. समाजात सर्वांचा समान दर्जा प्रस्थापित झाला पाहिजे तरच लोकशाही यशस्वी होईल.
भारतीय जातीव्यवस्था इथल्या लोकशाही प्रक्रियेला खीळ घालते अशी तक्रार डॉ. आंबेडकर करतात. इथले मतदार जातीविहाय होते. बहुसंख्येच्या उमेदवाराला मत देणे अल्पसंख्याक समाजाला भाग पडते. अल्पसंख्याकांची मते तोकडी असतात. बहुसंख्याक जाती गटातील मतदार अल्पसंख्य जातीच्या उमेदवाराला मते देत नाहीत.
अशा परिस्थितीत बदलत्या राजकीय बहुमतापेक्षा सातत्यपूर्ण जातीय बहुमताचे वर्चस्व प्रस्थापित होण्याचा धोका अटळ ठरतो. भारताची ही सामाजिक व आर्थिक परिस्थिती दिसत असल्यामुळे केवळ राजकीय लोकशाही नव्हे तर सामाजिक व आर्थिक लोकशाहीचे आव्हान पेलण्याचे आवाहन त्यांनी केले.
एक व्यक्ती एक मत हे राजकीय लोकशाहीचे तत्त्व मान्य करताना सामाजिक व आर्थिक लोकशाहीची जबाबदारी त्यांनी सरकारवर टाकली.
सारांश
या लेखामध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही विषयक विचार (Thoughts of Dr Babasaheb Ambedkar on democracy) जाणून घेतले. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून किंवा ईमेलद्वारे जरूर कळवा. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- राजरत्न आंबेडकर यांचे जीवन चरित्र
- डॉ. आंबेडकरांचे 130 प्रेरणादायी सुविचार
- बौद्ध धर्माशी संबंधित 70+ रंजक तथ्ये आणि महत्त्वपूर्ण माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयक लेख
- ‘धम्म भारत’चे अन्य लेख वाचा
‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत :
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.