Last Updated on 12 September 2025 by Sandesh Hiwale
बिहारमधील बोधगया येथे स्थित महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी सर्वात पवित्र स्थळ आहे, कारण येथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. मात्र, दुर्दैवाने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मीयांना पूर्ण नियंत्रण नाही तर ते हिंदूंच्या ताब्यात आहे, आणि याच प्रमुख कारणामुळे महाबोधी मुक्ती आंदोलन सुरु आहे.

महाबोधी महाविहार : पवित्र वारसा आणि संघर्षाचा इतिहास
बिहारमधील बोधगया येथे असलेले महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांसाठी सर्वात पवित्र तीर्थस्थान मानले जाते. प्राचीन बौद्ध वास्तुकलेतील हे अनमोल रत्न आहे. याच स्थळी इ.स.पू. 6व्या शतकात भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.
सम्राट अशोकाने या स्थळाचे महत्त्व ओळखून इ.स.पू. 3ऱ्या शतकात येथे महाबोधी महाविहार व स्तूप उभारले. बुद्धांना ज्ञानप्राप्ती होऊन सुमारे 200 वर्षांनी घडलेली ही घटना इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 2002 मध्ये या महाबोधी महाविहाराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली.
महाबोधी मंदिराभोवती विविध देशांतील एकूण 63 बौद्ध मठ आहेत.
बौद्धांचा ऱ्हास आणि हिंदूंचा ताबा
सुरुवातीची सुमारे 1500 वर्षे हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात होते. पण 13व्या शतकात तुर्क-अफगाण सेनापती बख्तियार खिलजीच्या आक्रमणामुळे या भागातील बौद्ध धर्माचा ऱ्हास सुरू झाला. तेराव्या शतकात तुर्की आक्रमणकर्त्यांनी हल्ला करेपर्यंत बोधगया मंदिर अनुयायांच्या ताब्यात होतं
यूनेस्कोच्या माहितीनुसार, 13व्या ते 18व्या शतकात हे स्थळ मोठ्या प्रमाणात ओसाड राहिले, नंतर ब्रिटिशांनी त्याचे नूतनीकरण सुरू केले.
परंतु महाबोधी मंदिराच्या संकेतस्थळानुसार, 1590 मध्ये घमंडी गिरी नावाचे हिंदू संन्यासी येथे आले आणि महाबोधी महाविहार मध्ये राहू लागले. त्यांनी कालांतराने महाबोधी मंदिराचा ताबा घेतला. त्यांनी विधी करणे सुरू केले आणि बोधगया मठाची (हिंदू मठ) स्थापना केली. तेव्हापासून (16व्या शतकापासून) हे महाविहार गिरी यांच्या वंशजांच्या ताब्यात राहिले आहे.
ब्रिटिश काळातील नूतनीकरण आणि बौद्ध जागृती
हिंदू महंतांच्या नियंत्रणाखाली असलेल्या महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनात बौद्धांना कोणताही अधिकार नव्हता. ब्रिटिश काळातही या मुद्द्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.
19व्या शतकात ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कन्निंगहॅम यांच्या प्रयत्नांमुळे या स्थळाचे महत्त्व पुन्हा उजागर झाले. त्याच सुमारास बौद्ध जगतातूनही आवाज उठू लागला.
इग्लंडचे पत्रकार आणि लेखक एडविन अर्नोल्ड यांनी 1885 मध्ये महाबोधी मंदिर बौद्धांना परत करण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला.
त्यानंतर 1891 मध्ये श्रीलंकेतील अनागरीक धर्मपाल बोधगया इथं आले आणि त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली. तसेच त्यांनी महाबोधी मंदिरावर बौद्धांचं नियंत्रण असावं यासाठी आंदोलन केलं.
पुढे श्रीलंका, जपान आणि म्यानमार येथून आलेल्या अनेक बौद्ध भिक्षूंनी या पवित्र स्थळावर बौद्ध धर्मीयांचे हक्क परत मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर चळवळ उभारली.
1903 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी हिंदू आणि बौद्ध यांच्यात समझोता करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. दोन्ही बाजूंनी राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी मोहीम सुरू केली.
1922 मध्ये गया इथं झालेल्या काँग्रेस अधिवेशनातही या मुद्द्यावर चर्चा झाली.
1992 मध्ये जपानमधून भारतात आलेले बौद्ध भिक्खू सराई सुसाई यांनी यासाठी मोठं आंदोलन केलं होतं.
स्वातंत्र्यानंतरचा कायदा
राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक नेत्यांच्या प्रयत्नानंतर ऑक्टोबर 1948 मध्ये बोधगया टेम्पल विधेयक बिहार विधानसभेत मांडण्यात आलं. त्यानंतर 1949 पासून हा कायदा लागू झाला. 28 मे 1953 रोजी पहिल्या बोधगया मंदिर व्यवस्थापन समितीनं आपला कार्यभार सांभाळला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन वर्षांनी, 1949 मध्ये बिहार सरकारने बोधगया मंदिर कायदा (Bodh Gaya Temple Act) पारित केला. यानुसार महाबोधी मंदिराचे व्यवस्थापन [हिंदूंच्या] बोधगया मठाकडून काढून आठ सदस्यीय समितीकडे सोपवण्यात आले, ज्यात जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली नऊवा सदस्य जोडला गेला.
बोधगया टेम्पल कायद्यातील तरतुदीनुसार बोधगया मंदीर व्यवस्थापन समितीत एकूण आठ सदस्य असून यामध्ये चार बौद्ध आणि चार हिंदू असतात.
समितीचे पद्धसिद्ध अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असून ते सुद्धा हिंदू असणं गरजेचं असायचे. गयाचे जिल्हाधिकारी हिंदू नसल्यास हिंदू सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष म्हणून नियुक्त करावी लागत असे.
दरम्यान 2013 मध्ये या कायद्यात दुरुस्ती करून जिल्हाधिकारी हिंदूच असावा, ही अट काढण्यात आली. पण, मंदिर व्यवस्थापन समितीत हिंदू सदस्य जैसे थे आहेत. बौद्ध धर्माचे लोक या गोष्टीला विरोध करत आहेत.
या कायद्यानुसार बौद्धांना समितीत स्थान मिळाले, परंतु हिंदूंचे वर्चस्व कायम ठेवले गेले. त्यामुळे आजही प्रत्यक्ष व्यवस्थापनात बोधगया मठाचाच प्रभाव असल्याचा आरोप बौद्ध करतात. बोधगया मठच प्रत्यक्षात महाबोधी महाविहाराच्या रोजच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो.
महाबोधी महाविहार बौद्ध धर्माचे असूनही तेथील व्यवस्थापन समितीत बौद्धांहून जास्त हिंदू सभासद आहेत! महाबोधी मंदिर या बौद्ध विहाराच्या व्यवस्थापन समितीत फक्त बौद्धच असावेत! त्यामुळे भारतातील आणि जगातील बौद्ध संघटना महाबोधी महाविहार या स्थळावरील बौद्ध धर्मीयांचे स्वामित्व पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बोधगया टेंपल ॲक्ट, 1949 – हिंदूंचे वर्चस्व
बिहार सरकारने 1949 मध्ये “बोधगया मंदिर कायदा 1949” (BT Act 1949) लागू केला, ज्याद्वारे महाबोधी महाविहाराच्या देखरेखीचे आणि व्यवस्थापनाचे काम महाबोधी मंदिर व्यवस्थापन समिती (BodhGaya Temple Management Committee – BTMC) कडे सोपवण्यात आले. या समितीत हिंदूंचे स्पष्ट वर्चस्व आहे.
BT ॲक्टच्या सेक्शन 3 नुसार –
-
या अधिनियमाच्या अंमलबजावणी नंतर, राज्य सरकार एक समिती तयार करेल. या समितीला मंदिराच्या भूमी आणि त्यासंबंधीच्या संपत्त्यांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण दिले जाईल.
-
समितीत एक अध्यक्ष आणि आठ सदस्य असतील, ज्यांना राज्य सरकार द्वारे नेमले जाईल. सर्व सदस्य भारतीय नागरिक असतील. यामध्ये चार सदस्य बौद्ध धर्माचे असतील आणि चार हिंदू धर्माचे असतील, ज्यामध्ये महंत (मुख्य पुजारी) देखील असतील. जर महंत अल्पवयीन, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतील किंवा समितीमध्ये समाविष्ट होऊ इच्छित नसतील, तर त्यांच्याऐवजी अन्य कोणत्याही हिंदू सदस्याला नेमले जाईल.
-
गया जिल्ह्याचा जिल्हा मजिस्ट्रेट (DM) समितीचा स्वयंचलित अध्यक्ष (ex-officio Chairman) असेल. (जर जिल्हा मजिस्ट्रेट हिंदू नसतील, तर त्या कालावधीसाठी राज्य सरकार कोणत्याही हिंदू व्यक्तीला अध्यक्ष म्हणून नेमेल, असाही नियम आधी होता. मात्र, 2013 मध्ये या कायद्यात दुरुस्ती करून जिल्हाधिकारी हिंदूच असावा, ही अट काढण्यात आली.)
-
राज्य सरकार समितीच्या सदस्यांपैकी एका सदस्याला सचिव म्हणून नेमेल.
समितीतील धर्मीयांचे प्रमाण:
एकूण सदस्यसंख्या – 9
अध्यक्ष – 1 (बहुदा हिंदू)
हिंदू सदस्य – 4
बौद्ध सदस्य – 4
महाबोधी टेंपल ॲक्ट 1949, यानुसार महाबोधी विहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये 4 हिंदू (ब्राह्मण) आणि 4 बौद्ध (भिक्खू) सभासद असावे.
या समितीचा अध्यक्ष “हिंदू”च असावा असाही नियम आधी होता, मात्र 2013 मध्ये या कायद्यात दुरुस्ती करून जिल्हाधिकारी हिंदूच असावा, ही अट काढण्यात आली.
असे असले तरीही जिल्हाधिकारी बहुदा हिंदूच असतो. आणि अशाप्रकारे महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये 5 हिंदू आणि 4 बौद्धांचा समावेश असतो, असे म्हणता येते.
हे प्रकरण इथेच अडकलं आहे की BMTC मध्ये हिंदू सदस्य का आहेत. सध्या महाबोधी मंदिराच्या मुक्तीसाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचे नेतृत्व ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम करत आहे.
महाबोधी महाविहाराच्या हिंदूंपासून मुक्तीची ही मागणी यापूर्वीही अनेक वेळा केली गेली आहे. हा वाद 19व्या शतकातच सुरू झाला होता. त्यावेळी BMTC ॲक्ट देखील पारित झालेला नव्हता. मात्र, महाबोधी मंदिरात त्या काळीही बौद्ध धर्माच्या लोकांना पूर्ण अधिकार नव्हता.
श्रीलंकेतील अनागरिक धर्मपाल नावाचे एक बौद्ध भिक्खू होते. दक्षिण आशियामध्ये बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानात त्यांचे विशेष योगदान मानले जाते. 1891 मध्ये भारत दौऱ्यादरम्यान त्यांनी पहिल्यांदा महाबोधी मंदिरावर बौद्ध धर्मियांचे अधिकार असावेत अशी मागणी केली.
त्या वेळेला बोधगया मठाचा या मंदिरावर हक्क होता. बोधगया मठ, बिहारच्या गया जिल्ह्यात स्थित आहे. हा मठ शंकराचे पूजा स्थळ म्हणून ओळखला जातो. अनागरिक धर्मपाल यांनी जोरदार मागणी केली, पण हिंदू महंतांनी महाबोधी मंदिरावरील आपला अधिकार सोडला नाही. त्यानंतरही बौद्ध धर्मीयांनी अनेक दशके महाबोधी मंदिराचा मुद्दा उपस्थित केला.
1992 मध्ये पुन्हा एकदा आंदोलन उभे राहिले. यावेळी अखिल भारतीय महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीने निदर्शने केली आणि मंदिराचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवण्याची मागणी केली. या आंदोलनात अखिल भारतीय भिक्षू महासंघ आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचाही सहभाग होता.
या चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘धम्म मुक्ती यात्रा’, जी मुंबई ते महाबोधी मंदिरापर्यंत रथयात्रेच्या स्वरूपात काढण्यात आली. ही यात्रा मंदिराच्या मुक्तीच्या आवाहनाचे प्रतीक होती. या यात्रेचे नेतृत्व भंते नागार्जुन आर्य सुरई ससाई यांनी केले होते, जे मूळचे जपानचे भिक्षू होते आणि नंतर त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले. नागपूरच्या आंबेडकरी बौद्ध समुदायाचे ते एक प्रमुख नेते मानले जाते.
पण 1995 मध्ये या आंदोलनाने एक महत्त्वाचे वळण घेतले. बौद्ध संघटना आवाज उठवत होत्याच, पण 1995 मध्ये बोधगयामध्ये प्रदीर्घ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बिहारमध्ये लालू यादव यांचे सरकार सत्तेत होते. 86 दिवसांच्या निदर्शनांनंतर, त्यांनी आपल्या हुशार मुत्सद्देगिरीने आंदोलन शांत केले आणि निदर्शने करणाऱ्या लोकांना बीएमटीसीचे सदस्य बनवले आणि त्यांना ‘व्यवस्थेत’ राहून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितले.
बौद्ध धर्मीयांवर अन्याय – अन्य धर्मांच्या स्थळांसाठी वेगळे नियम?
एखाद्या धर्मीयांच्या धार्मिक स्थळावर त्याच धर्म बांधवांचा अधिकार असतो आणि असावा, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.
* हिंदू मंदिराच्या व्यवस्थापन समितीत फक्त हिंदूच असतात.
* चर्चच्या व्यवस्थापन समितीत फक्त ख्रिश्चन व्यक्तीच असतात.
* गुरुद्वाऱ्याच्या व्यवस्थापन समितीत फक्त शीख लोकच असतात.
* मशिदीच्या व्यवस्थापन समितीत फक्त मुस्लिमच असतात.
* याप्रमाणेच, महाबोधी मंदिर या बौद्ध विहाराच्या व्यवस्थापन समितीत फक्त बौद्धच असावेत!
मात्र, महाबोधी महाविहार बौद्ध धर्माचे असूनही तेथील व्यवस्थापन समितीत बौद्धांहून जास्त हिंदू सभासद आहेत! हा बौद्ध धर्मीयांवरील मोठा अन्याय आहे.
बौद्ध धर्मावर होणारे अतिक्रमण
या व्यवस्थेमुळे महाबोधी महाविहारात हिंदू धर्माचे कर्मकांड आणि विधी कायदेशीरपणे केले जातात, जे बौद्ध धर्मात निषेधार्ह आहेत. या पवित्र बौद्ध स्थळावर बौद्ध धर्माचे आचरण व्हायला पाहिजे, पण येथे हिंदू धर्माचरण घडते.
काही हिंदू लोक महाबोधी मंदिराला “शिव मंदिर” म्हणून चुकीची ओळख देत आहेत, पण इतिहास पाहिला तर स्पष्ट होते की हे शिव मंदिर किंवा हिंदू मंदिर नसून, सम्राट अशोकाने बांधलेले भगवान बुद्धांचे महाविहार आहे.
महाबोधी मुक्ती आंदोलन – बौद्ध धर्मीयांची मागणी
12 फेब्रुवारी 2025 पासून बिहारमध्ये नव्याने ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ सुरू आहे. या आंदोलनात बौद्ध भिक्खू आणि उपासक महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे, परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बौद्ध धर्मीयांच्या प्रमुख मागण्या:
1. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्मीयांकडे द्यावे.
2. महाबोधी टेंपल ॲक्ट 1949 रद्द करावा आणि व्यवस्थापन समितीत फक्त बौद्ध धर्मीय असावेत.
3. समितीचा अध्यक्ष होण्याचा अधिकार फक्त बौद्ध धर्मीय व्यक्तीला द्यावा. अ-बौद्ध व्यक्ती अध्यक्ष असू नये.
4. महाविहाराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये कोणत्याही बाह्य धर्मीयांचा हस्तक्षेप थांबवावा.
बौद्ध धर्मीयांसाठी एक महत्त्वाची लढाई!
महाबोधी महाविहार केवळ एक पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ नाही, तर ते संपूर्ण बौद्ध समुदायासाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या संरक्षणासाठी आणि धार्मिक स्वायत्ततेसाठी लढा देणे प्रत्येक बौद्ध अनुयायाचे कर्तव्य आहे.
महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या, या आंदोलनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बौद्ध धर्माच्या हक्कांसाठी आवाज उठवा!
संदर्भ
- UNESCO : Mahabodhi Temple Complex at Bodh Gaya
- Bodhgaya Temple – Official Website
- बीबीसी : महाबोधी मंदिर वाद : बौद्ध आणि हिंदूंमध्ये संघर्ष, संप करणाऱ्या भिक्खूंची मागणी काय?
वाचकांसाठी :
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये किंवा ई-मेलद्वारे लिहून आवर्जून कळवा. धन्यवाद.
हे ही वाचलंत का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी
- ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणात बुद्ध पहिल्या आणि बाबासाहेब चौथ्या क्रमांकावर होते का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आद्यचरित्रे
- ‘या’ 12 भाषा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अवगत होत्या!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगातील सर्वात हुशार व्यक्ती ठरवणाऱ्या काही खास गोष्टी!
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.