विन्स्टन चर्चिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन दिग्गजांमध्ये अनेक समान पैलू आहेत. ‘सर्वात प्रभावी नेता’ असे दोघांचेही वर्णन केले जाते, एक “सर्वश्रेष्ठ ब्रिटिश” तर दुसरे “सर्वश्रेष्ठ भारतीय” म्हणून निवडले गेले आहेत. या दोघांचाही महात्मा गांधींना व ॲडॉल्फ हिटलरला कडवा विरोध होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेब व चर्चिल हे दोघेही लेखक, वृत्तपत्रकार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, उत्कृष्ट संसदपटू आणि कुशल राजकारणी होते. – Ambedkar and Churchill
Ambedkar and Churchill – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर विन्स्टन चर्चिल या दोन प्रभावशाली व्यक्तींमधील साम्यता
दोन व्यक्ती सतरा वर्षांच्या अंतराने आणि एकमेकांपासून चार हजार मैलांच्या अंतरावर या जगात आले आणि न केवळ त्यांच्या देशाचे तर संपूर्ण जगाचे सर्वोच्च नेते बनले.
एकाचे नाव होते विन्स्टन चर्चिल आणि दुसरे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दोन दिग्गजांमधील काही समान पैलूंवर नजर टाकूया.
सर विन्स्टन चर्चिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन आणि २०व्या शतकातील जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमधील साम्य असणाऱ्या गोष्टी आज आपण बघत आहोत. इंग्लंडमध्ये इ.स. 1933 आणि 1946 मध्ये डॉ. आंबेडकर व चर्चिल यांच्या भेटी सुद्धा झालेल्या आहेत. गेल्या शतकातील ‘सर्वात प्रभावी नेता’ असे दोघांचेही वर्णन केले जाते.
विन्स्टन चर्चिल यांना दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांच्या विजयाचे शिल्पकार मानले जाते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानाचे शिल्पकार मानले जाते.
दोन बोटे उंचावून V for Victory हा उत्साहवर्धक संदेश चर्चिल यांनी ब्रिटिशांना दिला, तर भारतीयांना मार्गदर्शक संदेश देताना बाबासाहेबांनी आपल्या हाताची तर्जनी वर उचलुन संसद भवनाकडे अंगुलिनिर्देशन केले.
Similarities between Dr. B. R. Ambedkar and Winston Churchill
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विन्स्टन चर्चिल यांची प्राथमिक माहिती
- विन्स्टन चर्चिल (१८७४-१९६५) यांचे पूर्ण नाव विन्स्टन लेनर्ड स्पेन्सर चर्चिल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) यांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर होय. डॉ. आंबेडकर हे जगातील सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती होते, तर चर्चिल इतके दीर्घकाळ मंत्रिपद जगातील कोणाही राजकारणी पुरूषाला अद्यापि लाभले नाही. इ.स. १९०० पासून इ.स. १९६५ पर्यंत चर्चिल ब्रिटिश संसदेत [खासदार] होते. बाबासाहेबांनी इ.स. १९२६ पासून इ.स. १९५६ पर्यंत सलग अनेक राजकीय पदे भूषवली.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) व सर चर्चिल विन्स्टन (Sir Winston Churchill) ही जगाच्या इतिहासातील दोन मोठी व्यक्तिमत्त्वे आहेत. हे दोघेही प्रचंड लोकप्रिय सुद्धा आहेत. हे दोघेही साहित्यिक (लेखक), वृत्तपत्रकार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, उत्कृष्ट संसदपटू आणि कुशल राजकारणी होते. बहुश्रुत – बहुआयामी धुरंधर म्हणून दोघांचेही नाव इतिहासात अजरामर झाले आहे.
Ambedkar and Churchill
एक ‘भारताला गणराज्य’ बनवणारे तर दुसरे ‘नाझी जर्मनीवर विजय’ मिळवणारे
- विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारताचे प्रथम कायदा व न्यायमंत्री होते.
- दुसऱ्या महायुद्धादरम्यान कठीण कालखंडात इंग्लंडला नाझींच्या जर्मनीवर विजय मिळवून देण्यात चर्चिल यांच्या नेतृत्त्वाची भूमिका निर्णायक ठरली होती, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला त्याचे संविधान बनवून देण्यात आणि देशाला लोकशाही प्रजासत्ताक भारत बनवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका निर्णायक ठरली होती.
एक ‘सर्वश्रेष्ठ ब्रिटिश’ तर दुसरे ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’
- इ.स. 2002 मध्ये इंग्लंडमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार “सर्वश्रेष्ठ ब्रिटिश” (100 Greatest Britons) म्हणून चर्चिल यांनी साहित्यिक शेक्सपीअर, समाजशास्त्रज्ज्ञ चार्ल्स डार्विन आणि अभियंते ब्रुनेल यांना मागे टाकले.
- तर, इ.स. 2012 मध्ये भारतामध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार “सर्वश्रेष्ठ भारतीय” (The Greatest Indian) म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांना मागे टाकले. सुरुवातीला महात्मा गांधी सुद्धा सर्वेक्षणात होते, मात्र गांधींची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही असे कारण देत सर्वेक्षणाच्या परीक्षकांनी गांधींना सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीपासून बाहेर काढले. गांधींचा आंतरराष्ट्रीय अपमान टाळण्यासाठी परीक्षकांनी असे केले, असे मत आंबेडकरी विचारवंतांनी मांडले. जर महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोघेही स्पर्धेत असते तर यांमधून कोण सर्वश्रेष्ठ ठरते याची भयंकर चुरस निर्माण झाली असती. जर केवळ लोकांच्या मतांवरच सर्वश्रेष्ठ भारतीयाची निवड झाली असती तर बाबासाहेबांनी बापुंना नक्कीच मात दिली असती, असे मागील काही साक्ष, आकडे पहिले तर लक्षात येईल.
Ambedkar and Churchill
दोघांचाही महात्मा गांधींना कडवा विरोध
चर्चिल व डॉ. आंबेडकर या दोघांचाही महात्मा गांधींना कडवा विरोध होता. महात्मा गांधी यांना विरोध करण्याची दोघांचीही पार्श्वभूमी व कारणे वेगवेगळी होती. चर्चिल यांचे भारतीयांबद्दल व भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत प्रतिकूल मत होते. ते १९४५ नंतर पंतप्रधानपदी राहिले असते तर कदाचित भारतीय स्वातंत्र्याला आणखी विलंब झाला असता.
हिंदी स्वातंत्र्याचे ते कट्टर विरोधक असल्यामुळे भारतास थोडेही अधिकार देण्याच्या धोरण त्यांस मान्य नव्हते. मात्र महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करत होते, आणि त्याला भारतासह जगभरातून समर्थन भेटत होते.
- “गांधींसारखा मिडल टेंपल (इंग्लंडमधील वकिलांशी संबंधित संस्था) मधून वकिली केलेला देशद्रोही माणूस आता अर्धनग्न अवस्थेत व्हाईस रिगल पॅलेस समोर अवतरतो. हे उबग आणणारं तर आहेच पण धोकादायकही,” असे उद्गार चर्चिल यांनी 1931 मध्ये गांधींबद्दल काढले होते.
- “केवळ उपोषणाची धमकी देतात म्हणून गांधींजींची सुटका व्हायला नको, असं चर्चिल यांनी कॅबिनेटला सांगितलं होतं. “साम्राज्याला धोका असणारा हा वाईट मनुष्य उपोषणानेच गेला तर आपली सुटकाच होईल,” असं चर्चिल म्हणाले होते.
गणराज्य भारताचे राष्ट्रपिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यातील मतभेद भारतात खूप प्रचलित आहेत. बाबासाहेब हे अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीअंताचा लढा यासाठी संघर्ष करत होते. बाबासाहेबांना बहिष्कृत वर्गांसाठी म्हणजेच अस्पृश्यांसाठी काही ठोस राजकीय आणि सामाजिक अधिकार हवे होते, परंतु गांधींनी याला अनेकदा कडवा विरोध केला.
अस्पृश्यांसाठी असलेले स्वतंत्र मतदारसंघ नाकारणे आणि पुणे करार घडवून आणणे हे त्याचे एक प्रमुख उदाहरण आहे. गांधींनी अस्पृश्यतेला विरोध केला असला तरी ते वर्णव्यवस्थेचे पक्के समर्थक होते. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधींचा शेवटपर्यंत विरोध केला.
- “ते (गांधी) पूर्णतः सनातनी हिंदू होते. ते कधीही सुधारक नव्हते, त्यांच्यात तशी कोणतीही प्रेरक शक्ती नव्हती. अस्पृश्यतेविषयीच्या त्यांच्या सगळ्या गप्पा अस्पृश्यांना काँग्रेसकडे आकर्षून घेण्यापुरत्याच होत्या….” असं डॉ. आंबेडकर म्हणाले होते.
- “ते कधीच महात्मा नव्हते. मी त्यांना “महात्मा” म्हणत नाही. मी आयुष्यात कधीही त्यांना ‘महात्मा’ असं संबोधलं नाही. ते या उपाधीला पात्र नाहीत, म्हणजे अगदी त्यांच्या नैतिकतेच्या दृष्टिकोनातून पाहिलंत, तरीही नाही,” असे गांधींबद्दल उद्गार डॉ. आंबेडकर यांनी 26 फेब्रुवारी 1955 ला बीबीसी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत काढले होते.
आपापल्या देशांत आदरणीय व पूजनीय
नाझीवादाला विरोध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विन्स्टन चर्चिल या दोघांनीही नाझीवादाला विरोध केला होता. ॲडॉल्फ हिटलर हा जगातला एक प्रसिद्ध हुकूमशहा आहे, आणि या दोघांचाही लोकशाहीवर विश्वास होता.
संदर्भ –
- मराठी विकिपीडिया – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- मराठी विश्वकोश – डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विन्स्टन चर्चिल
- https://www.bbc.com/marathi/india-46460676
- https://www.bbc.com/marathi/international-42791758
- फेब्रुवारी 2019 मध्ये मी ही पोस्ट फेसबुक वर लिहिली होती.
- विन्स्टन चर्चिल मराठी माहिती
- गांधी बनाम चर्चिल (बीबीसी हिंदी)
टीप –
या पोस्टमध्ये समान क्षेत्रातील दोन व्यक्तींमधील साधर्म्य किंवा साम्यता [similarities] असलेल्या बाबींवर प्रकाश टाकलेला आहे, व दोघांमधील काही समान पैलू बद्दल काही तथ्यात्मक मुद्धे मांडलेले आहेत. येथे बाबासाहेबांची चर्चिल सोबत तुलना [फरक] करणे, किंवा विन्स्टन चर्चिलचा गौरव करणे व महात्मा गांधींचा अनादर करणे असाही या पोस्टचा उद्देश नाही आहे.
हे सुद्धा वाचा :
खूप चांगली माहिती
खूप छान माहिती,
अजून अशाच चांगल्या माहिति चि अपेक्षा आहे,
धन्यवाद!